
इचलकरंजी /प्रतिनिधी-
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या ३३ व्या ऊस गाळप हंगामाचा मुहूर्त कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि सौ. किशोरी आवाडे या उभयतांच्या हस्ते काटा, गव्हाण आणि मोळी पूजन करून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक आमदार राहुल आवाडे उपस्थित होते.
संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे २०२५-२६ हंगामासाठी सुमारे २२ हजार ७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी चालू गाळप हंगामात आपला पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन प्रकाश आवाडे यांनी केले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०२५ पासून रितसर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामास सुरुवात होणार आहे. चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगून त्यांनी सर्व सभासद, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, अधिकारी-कर्मचारी या सर्वांना गाळप हंगामाकरीता शुभेच्छा दिल्या. ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन कारखान्याकडून नेहमी देण्यात येते. अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बावासी चौगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, माजी संचालक जे. जे. पाटील, जयपाल उणारे, धनंजय मगदूम, रावसाहेब मुरचिट्टे, सुकुमार किणींगे, विलास पाटील, अनिल वडगांवे, आण्णासाहेब शेंडुरे, रावसाहेब पाटील, जंबूकुमार देसाई, दिनकर कांबळे, संजय भोजकर, विलास खानविलकर, सुभाष नरदे, राजू नाईक, पद्माण्णा हेरवाडे, तानाजी पाटील आणि संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, सौ. कमल पाटील, सौ. वंदना कुंभोजे, प्रकाश पाटील, सुभाष जाधव आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी व सर्व अधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.



