


इचलकरंजी
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सन २०२५-२६ या ३३ व्या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला विनाकपात एकरकमी प्रति टन ३४०० रूपये दर जाहीर करण्यात आला आहे. तसेच हंगाम समाप्तीनंतर साखर उताऱ्यातील वाढीनुसार जादा ऊस दर देण्यात येईल.
संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे २०२५-२६ हंगामासाठी सुमारे २२ हजार ७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०२५ पासून कारखान्याच्या ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. कारखान्याकडून ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन नेहमी देण्यात येते. अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे.
तेंव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.



